इम्तियाज जलील यांच्याकडून संभाजी भिडेंची तुलना अजमल कसाबशी

 

औरंगाबाद | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जलील यांनी संभाजी भिडे यांची तुलना २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमीर कसाब याच्यासोबत केली आहे. “अजमल कसाबने देशाला बंदुकीच्या जोरावर कमजोर करण्याचा प्रयत्न केला. तर हे घाणेरडे लोक आपल्या जिभेचा वापर करुन देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. या घाणेरड्या लोकांना फारसं महत्व द्यायची गरज नाही,” असं इम्तियाज जलील म्हणाले.

भिडे गुरुजी म्हणाले की, “इस्लाम हाच देशाचा खरा शत्रू असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. जुन्या गोष्टी विसरुन पुढे जाण्याची देशद्रोही वृत्ती देशातल्या सुशिक्षितांमध्ये असल्याचंही ते म्हणाले. संभाजी महाराज बलिदानासंदर्भात पुण्यामध्ये पत्रकारांशी संभाजी भिडेंनी बोलत होते. संभाजी भिडे म्हणाले की, “औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या ही इस्लामच्या पोटतिकडीतून केली. संभाजी महाराजांची हत्या ज्यामुळे झाली तो इस्लाम आपल्या देशाचा खरा शत्रू आहे.”

संभाजी भिडे पुढे म्हणाले की, “औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती. त्यांचं एकमेकांशी वैर होतं म्हणून औरंगजेबानं संभाजी महाराजांना मारलं नाही. कन्याकुमारी ते काश्मीर असा देश तुकडे-तुकडे करुन हिंदू धर्म आणि हिंदू समाज संपवून टाकावा अशी त्याची भावना होती. संभाजी महाराजांची हत्या करुन त्याने अंशत: समाधान मिळवलं.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील म्हणाले की, “अजमल कसाब हा दहशतवादी होता. त्याने जेव्हा हल्ला केला त्यावेळी त्याचा उद्देश होता की, या देशाला बंदुकीच्या जोरावर कसं कमकुवत करता येईल. पण असे जे घाणेरडे लोक आहेत ते बंदुकीचा वापर करत नाहीत, जे आपल्या जिभेचा वापर करतात. हिंदू किंवा इस्लाम, कोणताही धर्म असू दे, धर्म वाईट असू शकत नाही. त्या धर्माला मानणारे ते वाईट किंवा चांगले असू शकतात. पण जसा अजमल कसाबचा उद्देश होता तसाच उद्देश या घाणेरड्या लोकांचा आहे.

Team Global News Marathi: