राज्यात नाही तर संपूर्ण जगभरातील कोरोनाचे संकट अद्याप ओसरलेले नाहीये. तसेच अदयाप पूर्णपणे राज्यातील लॉकडाऊन हटवण्यात आलेला नाही आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका अजून कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचं पालन करण्यास सांगितलं जात आहे. ‘माझा डाॅक्टर’ ऑनलाइन वैद्यकीय परिषदेचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळेस त्यांनी कोरोना परिस्थितीविषयी संबोधलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी टास्क फोर्स आणि डॉक्टरांसोबत कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी ऑनलाईन वैद्यकीय परिषद घेतली होती. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून, कोरोना नियमांचं पालन करणं सर्वांचीच जबाबदारी आहे.
पुढे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज आहे. आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर आपण या कोरोनाच्या संकटातून कधीच बोहर पडणार नाही. कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्व सेवा-सुविधांचे ऑडिट करून घेण्याचंही मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना आवाहन केलं आहे.