मुंबई : राज्यात आलेल्या तौक्त वादळाच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसून येत आहे. त्यातच सर्वाधिक कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घराचे पत्रे उडाले. घरातील नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाकडून या सर्व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आधिकारी दाखल झाले होते.
तौक्ते वादळाने नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अश्वासन दिले होते. मात्र अद्याप मदत मिळलेली नाही याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अजून एक पोकळ आश्वासन…पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावात अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत असा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.
प्रकरण असे की, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषांच्या बाहेर जाऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्यात आली होती. तोच निकष या ठिकाणीही असेल. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.