मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच बुधवार रात्रीपासून पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र या १५ दिवसात मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांवर कोणताही परिणाम होणार नाही असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले होते.
मात्र लॉकडाऊन जाहीर करूनही अद्याप काही ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही आणि अनावश्यक गर्दी केली जात आहे असे चित्र दिसून येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढचे पाऊल टाकत नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिला आहे. तसेच गर्दी होत असलेल्या ठिकाणी आवश्यक सेवाही बंद करा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
यावरी पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,’विवाह समारंभ हे कोरोना संसर्ग फैलावण्यास मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. त्यादृष्टीने सर्व नियम व्यवस्थित पाळले जातात की नाही हे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने पाहावे, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा कोरोना संसर्गाचा वेग खूप जास्त आहे.