मुंबई : संपूर्ण देशात कोरोनाने संकट अधिक गडद होत असताना दुसरीकडे रासायनिक खताच्या किमती वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मोठं चोळण्याचे काम केले आहे. याच पार्श्वभूमीवर वाढीव खताच्या किमतीवरून विरोधकांनी थेट मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा केंद्राला पत्र लिहून दर कमी करण्याचे आवाहन केले आहे. आता त्या पाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा केंद्रावर जोरदार टीका केली आहे.
“शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’ असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दीडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे,” असा आरोप पटोले यांनी केला.
तसंच दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आज कोरोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतकऱ्यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणाऱ्या मोदींनी हमीभावाऐवजी शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे.