सध्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून अनेक राज्या-राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये वाद झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात आता याच पाणी वाटप मुद्द्यावरून खुद्द सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केले आहे. जर उजनी धरणातील पाण्याचे वाटप ठरल्याप्रमाणे होईल. सोलापूरकरांच्या हक्काचं एक थेंब ही पाणी इंदापूरला नेलं जाणार नाही. तसं झालं तर मंत्रिपद, आमदारकीचं काय, राजकीय संन्यास घेईन,’ असे भाष्य भरणे यांनी केले आहे.
प्रकरण असे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला सोलापुरातील अनेक गावातील नागरिकांनी तसेच खुद्द पालकमंत्री भरणे यांनी विरोध दर्शवला होता. त्यात याच मुद्द्याचा फायदा घेऊन भाजपाने सुद्धा राजकारण खेळायला सुरवात केले होते, त्यामुळं सर्वपक्षीय नेते, संघटना यांनी मंत्री भरणे यांच्याविरुद्ध आंदोलन छेडले होते.
सदर बाब पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी सावध पवित्रा घेत आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यामुळं उजनीच्या पाण्याचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कारण एका बाजूला खोरे निहाय पाणी वाटपाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम असताना आमदार भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साहाय्याने सांडपाण्याच्या नावाखाली अधिकचे ५ टीएमसी पाणी इंदापूर-बारामती पट्ट्यात नेले आहे. त्यामुळं मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातील टेलएन्डच्या तालुक्यांना उजनीचे पाणी पूर्ण क्षमतेने कधी मिळणार, याचे खरं उत्तर आता तरी कोणाकडे नाही.