29 जुलै बुधवार रोजी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे.शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आलेले असून या धोरणामुळे दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे महत्त्व कमी होणार आहे. या निर्णयावर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपलं मत मांडलं आहे.
केदार शिंदे यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे की, दहावी बारावीचा ‘तेरावा’ घातला… शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो, असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना यापुढं एकाचवेळी अभियांत्रिकी आणि संगीत हे दोन्ही विषय घेऊनही उच्च शिक्षण पूर्ण करता येणार आहे. शालेय शिक्षणाची रचना आता १० + २ ऐवजी ५ +३ +३ +४ अशी करण्यात आली आहे. पहिली तीन वर्षे पूर्वप्राथमिक, त्यानंतर दोन वर्षे पहिली व दुसरी, पुढील तीन वर्षे तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी आणि अखेरची ४ वर्षे नववी ते बारावी अशा एकूण १५ वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आलं आहे.