पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तसेच मुख्य लढत होत असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा तृणमूलच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना डिवचले आहे.
काही दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या पायाला मार लागून गंभीर दुखापत झाली होती याच मुद्द्यावरून शाह यांनी टोला लगावला आहे. आशा आहे की 2 मेपर्यंत दीदींच्या पायाला झालेली दुखापत ठीक होईल. जेणेकरुन राज्यपालांकडे आपला राजीनामा देण्यासाठी त्या पायी जाऊ शकतील, तसेच पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या पाच टप्प्यातील मतदानामध्ये भाजप 122 हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावा अमित शहांनी केला आहे.
पश्चिम बंगालमधील पाच टप्प्यांच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हताश झाल्या आहेत कारण 122 हून अधिक जागांवर भाजप त्यांच्या पुढे आहे. भाजप उमेदवार शुभेंदु अधिकारी नंदीग्राममध्ये निवडून येतील. बॅनर्जी यांचं स्थान पाहता त्यांना मोठ्या पराभवानं परत पाठवणं गरजेचं आहे, असं अमित शहा म्हणाले आहेत.