मुंबई | उत्तर प्रदेशच्या सर्व मदरशांमध्ये दररोज राष्ट्रगीताचे गायन अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस. एन. पांडे यांनी मागील ९ मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत आदेश जारी केले होते. दरम्यान, यावरून आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“यूपीमध्ये अजान, रस्त्यावरील नमाज आणि आता मदरशात राष्ट्रगीत पण. महाराष्ट्रातील महाभकास आघाडीला भोंगे उतरवायला कायदा लागतो आणि आता मदरशात राष्ट्रगीत सक्तिसाठी पण कायदा लागणार का..? हिंदुत्वाचे कैवारी फक्त तोंडाने नुसतेच बोलणार की कृती पण करणार. आ देखे जरा किसमें कितना है दम,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
आदेशात म्हटले आहे की, २४ मार्च रोजी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे. राज्यात रमजान महिन्याच्या कालावधीत मदरशांना ३० मार्च ते ११ मेपर्यंत सुटी जाहीर झालेली होती. १२ मेपासून नियमित वर्ग सुरू होतील. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हे आदेश लागू करण्यात आले.