महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी राज्यभरातील जिल्ह्यांचा दौरा करत शिवसंवाद यात्रेला सुरुवात केलेली आहे आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा मालेगावात आल्यानंतर त्यांनी याठिकाणी जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे हे तात्पुरते मुख्यमंत्री आहेत, असा दावाही त्यांनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदे तात्पुरते मुख्यमंत्री असून हे सरकार बेकायदेशीर, बेईमानाचे आणि गद्दारांचे आहे. त्यामुळे ते कोसळल्याशिवाय राहणार नाही. पन्नास थर लावून दहीहंडी फोडल्याचे हे लोक सांगतात. मात्र तुम्ही पन्नास थर नाही तर पन्नास खोके लावून दहीहंडी फोडली आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरेंनी यावेळी दादा भुसे यांच्यावरही सडकून टीका केली. दादा भुसे यांचं नाव न घेता आदित्य ठाकरे म्हणाले, की इकडचे जे आमदार आहे त्यांना आपण मंत्रीपद दिलं त्यांना कृषिमंत्री केलं. मात्र, आताच्या सरकारने त्यांना काय दिलं असा सवाल आदित्य ठाकरेंनी जनतेला विचारला .लवकरच मध्यावधी निवडणूक होणार असून त्यासाठी तुम्ही तयार राहा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.