गुजरात | गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल नाराज असल्याच्या चर्चा होत्या. हार्दिक पटेलने आपल्या ट्विटर हँडलवरून राजीनाम्याची माहिती दिली. आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी म्हटलंय.
हार्दिक पटेल काही काळापासून ते काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत. अनेकवेळा त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता राजीनामा देताना हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचे बडे नेते विकले गेलेत, असंही ते म्हणाले आहेत. हार्दिक पटेल गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज होते आणि ते सातत्याने राज्याचे नेते आणि हायकमांडला प्रश्न विचारत होते. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना हार्दिक पटेलच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
हार्दिक पटेल यांनीही आपल्या राजीनाम्यात काँग्रेसचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. राजकारणात सक्रिय असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा धर्म आहे की त्याने जनतेसाठी काहीतरी करत राहावं. पण काँग्रेस पक्षाला गुजरातच्या जनतेसाठी काहीही चांगलं करायचं नाही, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे जेव्हा मला गुजरातसाठी काही करायचं होतं, तेव्हा काँग्रेसने मला तुच्छ लेखलं, असं हार्दिक पटेल म्हणाले.