मुंबई | T20 विश्वचषक 2021 मध्ये अत्यंत खराब कामगिरीनंतर टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या लवकरच निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे आणि करिअरसाठी तो क्रिकेटचा एक फॉरमॅट सोडू शकतो. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे.
इनसाईड स्पोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे की हार्दिक पांड्या दुखापतीशी झुंज देत आहे आणि तो कसोटीतून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे, पण त्याने अद्याप बोर्डाला याबद्दल अधिकृतपणे माहिती दिली नाही.’ हार्दिक पंड्या अद्याप टीम इंडियाच्या कसोटी टीमचा भाग नाही. मात्र, त्याची निवृत्ती टीम इंडियासाठी मोठा झटका असेल आणि संघाला त्याचा बॅकअप लवकरात लवकर शोधावा लागेल.
हार्दिक पांड्या एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी कसोटीला अलविदा म्हणू शकतो. हार्दिक पांड्याला 2019 मध्ये पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून पांड्याला पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करता आलेली नाही, त्यामुळे त्याचा फटका त्याला सहन करावा लागत आहे. हार्दिक पंड्या सध्या त्याच्या फिटनेसवर काम करत आहे आणि वृत्तानुसार तो विजय हजारे ट्रॉफी खेळणार नाही. हार्दिक पांड्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे कारण पुढील दोन वर्षात टीम इंडियाला टी-20 आणि वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे.