“हा तर मराठी माणसाशी द्रोह; हा महाराष्ट्राशी द्रोह” भाजपाचा शिवसेनेवर निशाणा

 

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकयांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती अटक केली. विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे.नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे.

मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. याच दरम्यान आता भाजपाने पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

“हा तर मराठी माणसाशी द्रोह; हा महाराष्ट्राशी द्रोह” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. “दहशतवाद्यासोबत जमिनीचा व्यवहार करणाऱ्याचं समर्थन शिवसेना फक्त मुख्यमंत्रीपदासाठी करणार का?” असा सवाल विचारला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येयांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

“ज्या दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट करून मराठी माणसांना मारले…ज्या दाऊदने शिवसेनाभवनजवळ बॉम्बस्फोट घडविला… अशा आतंकीसोबत जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांचं समर्थन शिवसेना आता फक्त मुख्यमंत्रीपदासाठी करणार का? हा तर मराठी माणसाशी द्रोह; हा महाराष्ट्राशी द्रोह” असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Team Global News Marathi: