दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयावर आता विरोधकांनी शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता आमदार रोहित पवारांनी सुद्धा या निर्याणानंतर मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
ट्विट करून त्यांना या निर्णयाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या निर्णयावर टीका केली जात आहे. विरोधीपक्षच नाही, तर विविध स्पर्धा परीक्षा देणारे त्याचप्रमाणे इतर खेळप्रकारातील खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. भावनेच्या भरात मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. हा पोरखेळ आहे, असा संतापही अनेकजण व्यक्त करत आहेत. अशाप्रकारचे निर्णय घेताना सर्वांनाच विश्वासात घ्यायला हवे, अशी भूमिका मांडली जात आहे.
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.