आशिया खंडातील मोठ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. खंडप्राय भारताला तिन्ही बाजूने पाण्याचा वेढा आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारताला एकूण सात हजार 516 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.समुद्र किनाऱ्यावर शेकडो शहरं वसलेली आहेत. काही शतकांपूर्वी अतिशय लहान असलेल्या या शहरांचा पसारा आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मानवाने समुद्र किनाऱ्यांवर भर घालून तिथे आपली वस्ती निर्माण केली आहे. मात्र, भविष्यात ग्लोबल वॉर्मिंग आणि मानवाच्या समुद्रावरील अतिक्रमाणाचे भयानक परिणाम भोगावे लागणार आहेत. पुढील आठ वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत भारतातील मुंबई, कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम सारख्या मोठ्या शहरांची किनारपट्टी अतिशय लहान होण्याचा धोका आहे. समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीमुळे जमीन गिळंकृत होईल. इतकंच नाही तर हजारो लोकांना त्यांची घरं आणि व्यवसाय सोडावे लागतील. 2050 पर्यंत या शहरांची स्थिती अतिशय बिकट होईल.
समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा मुंबईतील किमान एक हजार इमारतींना फटका बसू शकतो. किमान 25 किलोमीटर लांबीचा रस्ता खराब होईल. जेव्हा भरती येईल तेव्हा सुमारे दोन हजार 490 इमारती आणि 126 किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली जाईल, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.