सध्या राज्यात कोरोना संसर्गाचे संकट उभे राहिलेले असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडताना दिसत आहे. त्यातच चक्रीवादळाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि विरोधात बसलेले भारतीय जनता पक्षाचे नेते एकमेकांवर बेछुड आरोप जाताना दिसत आहे, त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे उदाहरण देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
लातूर भूकंपावेळी शरद पवारांनी केलेल्या कामाची आठवण करून देत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री म्हणतात, दोन दिवसांत पंचनामे करून मदत जाहीर करू. पण, दोन दिवसांत पंचनामे होण्यासाठी त्यांनी ३ दिवस तिकडे जायला हवं होतं. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी माझं काही वाकडं नाही. ते काही माझे दुश्मन नाहीत. पण प्रशासन हे काठी घेऊन बसल्याशिवाय ताळ्यावर येत नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
शरद पवार राजकीयदृष्ट्या आमचे कितीही विरोधक असोत. पण लातूरच्या भूकंपामध्ये शरद पवार लातूरमध्ये तंबू ठोकून राहिले. त्यामुळे तिथली परिस्थिती नियंत्रणात आली. एवढ्या मोठ्या संकटात ८ दिवस राहणं कठीण आहे. आता वादळ आल्यानंतर तिथली हवा बरी आहे. तुम्हाला प्रकृतीच्या समस्या आहेत तर तंबूत नका राहू. पण प्रशासनात भिती निर्माण व्हायला हवी, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिला.