सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरतआहेत; सामनातुन भाजपवर बोचरी टीका
शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजप नेतृत्वासोबतचा संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याचं चित्र आहे. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलेल्या एका वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेनं खळबळजनक दावा केला आहे. गडकरींविरोधातही एकेकाळी कुभांड रचण्यात आलं आणि आणि ईडीच्या धाडी टाकण्यात आल्या, असं शिवसेनेनं आपलं मुखपत्र असेलल्या दैनिक ‘सामना’तून म्हटलं आहे.
‘सध्याचं राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण आहे,’ असं म्हणत नितीन गडकरी यांनी राजकीय स्थितीबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं म्हटलं आहे की, ‘सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात गडकरी हे सगळ्यात अनुभवी व कार्यक्षम मंत्री आहेत. राजकीय सूडबुद्धीने वागणारे ते नेते नाहीत. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे समाजकारण टिकलं तरच राजकारण टिकेल या भूमिकेवर ते ठाम आहेत. अत्यंत लहान वयात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायची वेळ आली तेव्हा त्यांच्याविरुद्ध कुभांड रचून रोखण्यात आले.
गडकरी यांच्या अनेक संस्थांवर तेव्हा ‘ईडी’सह तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या, त्यांना बदनाम केले गेले. गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ मिळाली असती तर देशाचा राजकीय इतिहास पूर्णपणे बदललेला दिसला असता,’ अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत
राष्ट्राच्या आकांक्षा जशा महाकाव्यात प्रकट व्हाव्यात तसे नाथ पैंच्या वक्तृत्वातून आमच्या सर्वांचे पडसाद उमटतात असे एकदा कवी वसंत बापट म्हणाले होते. अलीकडे नितीन गडकरी यांच्या अनेक वक्तव्यांतून लोकभावनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. गडकरी यांचे नागपूरचे भाषण सगळयांनाच विचार करायला लावणारे आहे. सध्या ‘राजकारण’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे.
महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले आहे,” अशी निरवानिरवीची भाषा श्री. गडकरी यांनी करावी हे वेदनादायी आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरतआहेत.
सध्याच्या राजकारणातील सत्यावर गडकरी यांनी नेमके बोट ठेवले
“त्यांना जे चालले आहे ते असहय होत आहे, पण करायचे काय? या प्रश्नाने सतावले आहे. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे अधिक महत्त्वाचे आहे. काही माणसे आयुष्यभर जीवनमूल्यांकरिता संघर्ष करतात, मात्र ती राजकारणात शस्वी ठरतातच असे नव्हे.
नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर श्री. गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे. गडकरी हे स्वता:ला सध्याच्या राजकारणात ‘फिट’ मानत नाहीत. भोवती गारद्यांचा गराडा आहे व हाती अनीतीच्या तलवारींचा खणखणाट सुरू आहे. त्यामुळे अस्वस्थ गडकरींनी नागपुरात मन मोकळे केले असे दिसते.
सध्याचे राजकारण हे विचारांचे, नीतिमत्तेचे राहिलेले नाही. श्री. गडकरी यांनी गांधी काळातील राजकारणाचा उल्लेख केला, पण भारतीय जनता पक्षाला गांधी विचार मान्य नाहीत. तरीही गडकरी गांधींचा संदर्भ देतात हे महत्त्वाचे. पूर्वी समाजकारणासाठी लोक राजकारणात येत होते, आज तसे नाही” असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.