राज्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी असल्याचे दिसत आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. तर गडचिरोलीत पडणाऱ्या धो-धो पावसाने ट्रक वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळं नदी नाले धुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत आहे. राज्यात काही ठिकाणी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. नदी नाल्यांना काही ठिकाणी पूर आले आहेत. तर मराठवाड्यात या पावसामुळं शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पीकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात चालकाने हलगर्जीपणाने गाडी घातली होती. या गाडीत 5 प्रवाशी होते. गाडी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी टपावर आश्रय घेतला त्यानंतर गावकऱ्यांना त्यांचा जीव वाचवण्यात यश आले.