नाथ संप्रदायातील गडावर येऊन नाथांचा आशिर्वाद तर मिळालाच, पण त्याबरोबर गोपीनाथांचादेखील आशिर्वाद मिळाला, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. याशिवाय, गडावरील प्रलंबित आराखडा लवकर मंजुर करून सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या 47वा पुण्यातिथी सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा ध्वज नव्हे ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे. महाराज आपला आणि गडाचा सेवेकरी म्हणुन काम करत राहीन. नाथांचा आर्शिवाद घेण्यासाठी गडावर आलोय. नाथांचा तर आशिर्वाद मिळालाच, पण राजकारणात गोपीनाथांचा आर्शिवद मला मिळाला. मराठवाड्यातील पंढरी ही गहिनीनाथ गडावर आहे. हेलीकॉप्टरमधून भक्तांचा महासागर पाहायला मिळाला. देश, देव, धर्म ,संतामुळे वाचला आहे.
संस्कार, संस्कृती वारकरी संप्रदायामुळे जिवंत आहे. पंढरीच्या वारी रस्ताकामाचा प्रश्न मार्गी लावू. गडावर येणाऱ्या भाविकांसाठी मंजुर केलेला आराखडा पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मागच्या काळात मराठवाड्य़ाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न केले, पण अडचणी आल्या होत्या. येत्या काळात समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणुन मराठवाड्यात पाणी आणण्याचा प्रयत्न लवकरच करणार. मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी भगिरथ प्रयत्नाला यश मिळावे, हाच आशिर्वाद वामनभाऊनी द्यावा असेही फडणवीस म्हणाले.