पुणे | महाविकास आघाडी सरकारमधील निधी वाटपाच्या कुरबुरी आजपर्यंत लपून राहिलेल्या नाहीत. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत याविषयी काँग्रेस चे काय मत आहे, हे एव्हाना उभ्या महाराष्ट्राला ठावूक आहे.मात्र, आज प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केल्यानंतर अजित पवारांनी या नेहमीच्या टीकेला थेट आणि सविस्तर उत्तर देत अनेकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून काथ्याकूट सुरूच होणार आहे.
निधी वाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, संपूर्ण राज्य डोळ्यांसमोर ठेवून निधी द्यावा लागतो. त्यामुळे मला तसे वाटत नाही. पथदिवे आणि ग्रामपंचायतीकडून येणारे पैसै मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी यामधे मुख्य सचिव, काही मंत्री यांना सूचना दिल्या आहेत, असे उत्तर त्यांनी नितीन राऊत यांच्या नाराजीबद्दल दिले.
कोरोनाकाळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे पैसै आणखी दोन वर्षे द्यावेत, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या उपस्थितीत उद्या बैठक घेण्याचा विचार आहे. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असे अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखविले होते.