मुंबई | राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. कारण तिसरी लाट आणि डेल्टा विषाणू नियंत्रणात ठेवण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल.
करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलं होत.
त्याच बरोबर राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.