नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारी दोन दिवसांपूर्वीच गुंडाळण्यात आले. फोन टॅपिंग प्रकरण आणि वादग्रस्त कृषी कायद्यांवरून काँग्रेससह सर्व विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने अधिवेशनातील बहुतांश कामकाजावर गदारोळाचे पाणी पडले.
संसदेचे अधिवेशन १९ जुलैला सुरू झाले. ते १३ ऑगस्टला समाप्त होणार होते. मात्र, ते निर्धारित वेळापत्रकाच्या आधीच आटोपते घेण्यात आले. अधिवेशन काळात लोकसभेच्या १७ बैठका झाल्या. त्यामध्ये गदारोळामुळे त्या सभागृहाचे कामकाज केवळ २१ तास चालले. लोकसभेत गदारोळातच १९ विधेयके मंजूर करण्यात आली. अधिवेशनात राज्यसभेतही लोकसभेपेक्षा वेगळे चित्र दिसले नाही.
राज्यसभेत १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान जोरदार गोंधळ झाला. याचवेळी वेलमध्ये उतरुन आंदोलन करणाऱ्या महिला खासदारांनी निषेध व्यक्त करत कागद फाडून भिरकावले. यादरम्यान मार्शल्सकडून गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर सरकारने विरोधकांनी सभागृहात उपस्थित मार्शल्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
याच मुद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’मी माझ्या ५५ वर्षांच्या संसदीय करिअरमध्ये असं कधीचं पाहिलं नाही. राज्यसभेत ज्याप्रकारे महिला खासदारांवर हल्ला करण्यात आला. या पूर्वी मी कधीच असं बघितलं नाही. सभागृहात हे योग्य झाले नाही. हे एकप्रकारे वेदनादायी अन् लोकशाहीवर हल्ला करणे आहे. असं शरद पवार म्हणाले आहेत.