कोल्हापूर | आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री यांची उमेदवारी निश्चित आहे. दुसरीकडे या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.
क्षीरसागर यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठला निर्णय घेणार यावर आता पुढील समीकरणे अवलंबून असणार आहेत. मात्र क्षीरसागर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची चिंता वाढवली आहे.
अशातच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिदिनी शिवसैनिकांना संबोधित करताना सर्व निवडणुका लढविण्याचा संदेश दिला होता. त्यामुळे शिवसैनिकांनाही या जागेसाठी उत्साह आला आहे. मात्र काॅंग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेचा उमेदवार येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांनीही पोटनिवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच क्षीरसागर यांनी मात्र नेत्यांच्या पातळीवर लढण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.