हैदराबादच्या निजामाच्या तावडीतून मुक्त होत स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी संस्थानातील स्वातंत्र्यसैनिकांनी लढा देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्याला आज १७ सप्टेंबर रोजी ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. या मुक्तिसंग्रामाच्या लढय़ाला उजाळा देतानाच त्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः संभाजीनगर येथे उपस्थित राहिले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केलं. यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा तसंच निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
निजामाच्या आपल्याला कोणत्याच खुणा ठेवायच्या नाहीत, असं सांगताना येणाऱ्या काळात विकास काय असतो, हे शिवसेना दाखवून देईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या एमआयएमला त्यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर केलं. आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले त्यांना मला सांगायच आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे आणि अजून खूप विकास होणार आहे, असं ते म्हणाले.