पैशासाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. व्याजाने घेतलेल्या रक्कमेतील २ हजार रुपये नंतर देतो म्हणून सांगितले पण शिवीगाळ करत तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारण्याची खळबळजनक घटना वर्ध्यातील नागसेन नगर परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभू सोनगडे असं मृत तरुणाचे नाव आहे.
नागसेननगर येथील मयत शंभू सोनगडे याची पत्नी जयमाला शंभू सोनगडे यांनी ५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील ३ हजार रुपयांचा परतावा देखील केला होता. या रक्कमेतील 2 हजार रुपये परत द्यायचे होते. त्याकरीता २ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी शैलेश येळणे हा सोनगडे यांच्या घरी गेला. त्यावेळी शैलेश येळणे याने उर्वरित रकमेची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने लवकरच परतावा करेल, असं सांगितलं.
त्यावरून येळणे याने सोनगडे यांच्याशी वाद घातला. दरम्यान, उपस्थितांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण वादानंतर शैलेश येळणे घराबाहेर आला आणि गाडीत बसला. बाहेर गेल्यानंतर शैलेश येळणेने कार सुरू करत बाहेर आलेल्या शंभू सोनगडे यांच्या अंगावर गाडी नेली. आरोपी शैलेश एवढ्यावरच थांबला नाही कर त्याने त्याच गाडीने शंभू सोनगडे यांना फरफटत नेले. घटना दिसताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत गंभीर जखमी शंभू सोनगडे यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.