“पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो, तशी भाजपची अवस्था”

 

मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपने राज्यभरात घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. आता या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना भाजपचा चांगलाच समाचार घेतला होता. सत्तेच्या बाहेर गेल्याने भाजप कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि तडफडतो तशी भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळे ते येनकेन प्रयत्न करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी तर १५ ऑगस्टला मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचं काही पडलेलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

ईदच्यावेळीही बंधनं आणली होती. बकरी ईदच्यावेळी मुस्लिमांमध्येही रोष निर्माण झाला होता. पण राज्य सरकार नरमले नाही. त्यांना प्रतिकात्मक कुर्बानी देण्याचं आवाहन करण्यास सांगितलं होतं. तसं पत्रकही राज्य सरकारने काढलं होतं. हे माहीत नसेल तर त्याचीही एक कॉपी पाठवतो. पण भाजप मुस्लिम आणि हिंदू हा वाद सातत्याने करत आहे. मानवतेला कलंक लावण्याचं पाप भाजप सातत्याने करत आहे. ते त्यांनी बंद करावं, असं ते म्हणाले.

Team Global News Marathi: