मुंबई | राज्यात शिवसेना पक्षाने महाविकास स्थापन करून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर युती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. मात्र दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी येणाऱ्या निवडणुकीला स्वबळाचा अंग देत आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम केले होते. त्यापाठोपाठ पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा स्वबळाचा नारा दिला होता. मात्र आता चव्हाण यांनी पटोले यांची पाठराखण केली आहे.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग जाणीवपूर्वक केला गेला. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालविणे हे आमचे सगळ्यांचे पहिले प्राधान्य आहे. प्रत्येक प्रदेशाध्यक्षाला आपला पक्ष वाढावा, तो जास्तीत जास्त संख्येने पुढे यावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या भूमिकेकडे त्याच नजरेतून बघितले पाहिजे, त्यातून वेगळे अर्थ काढणे चुकीचे आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना सांगितले.
पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे त्यावर आपली भूमिका काय आहे? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, प्रत्येक प्रदेशाध्यक्ष आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे ते कामच आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून तसाच अर्थ अभिप्रेत आहे. पण निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही एकटेच स्वतंत्रपणे गेलो तर आम्हाला किती जागा मिळतील याचाही विचार केला पाहिजे.