वेगवान भारतासाठी पंतप्रधान मोदींची १०० लाख कोटींची योजना

 

नवी दिल्ली | | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून स्वातंत्र्य दिन सोहळ्यास सुरुवात केली आहे. ‘हे वर्ष नवीन ऊर्जा, चेतना घेऊन येईल’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. “आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होत.

तसेच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान एक मोठी घोषणा केली आहे. “देशातील विविध भागांना जोडणाऱ्या ७५ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार” असल्याचं म्हटलं आहे. “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ आठवडे चालणाऱ्या कार्यक्रमांदरम्यान देशातील विविध भागांना ७५ वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून जोडणार” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात गतीशक्ती राष्ट्रीय योजनेची घोषणा केली. मोदी सरकारने या योजनेसाठी १०० लाख कोटींची तरतूद केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरात पायाभूत सुविधांच्या विकासासोबत मोठ्याप्रमाणावर रोजगारही उपलब्ध होतील.आधुनिकीकरणासाठी भारताला पायाभूत सुविधांची निर्मिती करुन सर्वांगणी विकास साधता आला पाहिजे. यामध्ये गतीशक्ती योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मोदींनी सांगितले.

देशातील पायाभूत सुविधा या आणखी बळकट केल्या पाहिजेत. दळणवळणासाठी गतीशक्ती ही खास योजना असेल. जेणेकरून सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

Team Global News Marathi: