अभिनेत्री कंगना हिच्याविरोधात जेष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी अंधेरी कोर्टाने तिच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. समन्स बजावूनही कंगना हजर राहू शकली नव्हती, त्यानंतर हे पुढचे पाऊल अंधेरी न्यायालयाने उचलले आहे. या प्रकरणामुळे कंगनाच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जावेद अख्तर यांची रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना घेतलेल्या एका मुलाखतीत बदनामी केल्याचे दाव्यात म्हटले आहे. या प्रकरणी दंडाधिकारी आर. आर. खान यांनी जुहू पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केला. कंगनावर केलेल्या आरोपांत तथ्य असल्याने आणखी तपास करावा लागेल, असे पोलिसांनी अहवालात म्हटल्याचे जावेद यांचे वकील कुमार भारद्वाज यांनी न्यायालयाला सांगितले होते.
अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, अर्णव यांना दिलेल्या मुलाखतीत कंगनाने जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील ‘सुसाईड गॅंग’मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. जावेद यांची प्रतिमा तिच्या या आरोपांमुळे मलिन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप व्हायरल झाल्याचा युक्तिवाद भारद्वाज यांनी केला होता.