फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस पथक सागर बंगल्यावर, मंत्री आदित्य ठाकरे म्हणतायत की

 

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांचे सायबर गुन्हे पथक दुपारी १:०० वाजता सागर बंगल्यावर दाखल झाले आहे. सध्या त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी पोलीस प्रक्रियेवर बोलू शकत नाही. पण कायदा आपलं काम करेल. भाजपला नैराश्य आले आहे. याच नैराश्यातून भाजप महाविकासआघाडी सरकारवर आरोप करत आहे. आम्ही केंद्र सरकारप्रमाणे तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाही, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी काढता पाय घेतला. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सध्या सागर बंगल्यावर पोलिसांचे पथक देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेत आहे. पोलीस बदल्यांमधील भ्रष्टाचार प्रकरणाची गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी सायबर गुन्हे पथकाकडून देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न विचारले जातील. त्यावर देवेंद्र फडणवीस काय माहिती देणार, हे पाहावे लागेल. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे मला माहितीचा स्रोत उघड करणे बंधनकारक नाही. मला विशेषाधिकार आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या जबाबातून पोलिसांच्या हाती कितपत माहिती लागणार, याबाबत शंकाच आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी सागर बंगल्यावर आलेल्या पोलीस पथकात डीसीपी हेमराज सिंग राजपूत, एसीपी नितीन जाधव आणि दोन पोलीस निरीक्षकांचा या पथकात समावेश आहे. जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असताना भाजपचे प्रमुख नेते सध्या सागर बंगल्यावर ठाण मांडून बसले आहेत. तर दुसरीकडे राज्यभरात फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीची भाजप कार्यकर्त्यांकडून होळी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Team Global News Marathi: