..तर फडणवीसांनाही तातडीने अटक केली पाहिजे”; राष्ट्रवादीच्या नेत्याने ईडीला पाठवले पत्र

 

नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत अशातच आता माजी आमदार अनिल गोटे यांनी ईडीला पत्र लिहिले असून या पत्रामध्ये त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज माफिया असणाऱ्या इक्बाल मिर्चीशीसंबंधित असणाऱ्या एका बड्या बिल्डरकडून पैसे घेतल्याचा धक्कादायक आरोप गोटे यांनी केला.

इक्बाल मिर्ची हा १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आहे. गोटे यांनी लिहिलेल्या पत्रात २०१४ पर्यंत या बिल्डरने भाजपाला कधी निधी दिला नव्हता असेही म्हटले आहे. मात्र राज्यामधील भाजपाची सूत्र फडणवीस यांच्या हाती गेल्यानंतर भाजपाने एरकेडब्यू डेव्लपर्सकडून २० कोटींचा निधी घेतला. ही कंपनी राजेश वाधवान यांच्या मालकीची असून सध्या ते पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगामध्ये आहेत.

अनिल गोगटे यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेपर्यंत आपल्याला भाजपाला मिळालेल्या या निधीसंदर्भात कल्पना नव्हती असा दावाही गोटे यांनी केला आहे. ‘जर मलिक यांना दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन अटक होऊ शकते तर ईडीने हेच तर्क भाजपासाठीही लावलं पाहिजे आणि फडणवीस यांना तातडीने अटक केली पाहिजे. मी यासंदर्भात ईडीला पत्र लिहिलं आहे,’ असे गोटे यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: