फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द, काँग्रेसने लगावला टोला |

 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने शनिवारी संपूर्ण राज्यभरात चक्काजाम आंदोलन पुकारले होते. यावेळी अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आता याच आंदोलनावरून कॉण्ग्रेसने माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाला ४ महिन्यांत आरक्षण देईन अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा देत आहेत. मात्र, याच फडणवीसांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपचे पाप आहे. फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत,” अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे

पुढे सावंत म्हणाले की, “सत्ता मिळवण्यासाठी बेफाम आश्वासन द्यायची आणि नंतर त्या आश्वासनांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या ही फडणवीसांची कार्यपद्धती आहे. धनगर समाजाच्या मेळाव्यात त्यांना क्या हुआ तेरा वादा हे गाणे हे धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी उगाचच ऐकवले नव्हते. म्हणून जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण करण्याला भाजपाच जबाबदार आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळातच या जिल्ह्यात जिप गट आणि पंस गणाची रचना झाली होती.”

Team Global News Marathi: