मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अयोध्येचे दौरा केला होता.Cयावेळी शिंदे गटातील काही आमदार अयोध्येत दौऱ्यावर गेले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. शिंदे गटात काहीतरी वाद झाले आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत असताना संजय राऊतांनी पुन्हा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटात घुसमीरीचं वातावरण तयार केलंय. त्यावर आता शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतूक केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी म्हणत थेट संजय राऊतांना टोला लगावला आहे. आम्ही मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो नाही तर, कामासाठी शिंदे यांच्यासोबत गेलो होतो. असं स्पष्टीकरण देखील बच्चू कडू यांनी दिलंय. फक्त 8 महिन्यांसाठी मंत्रीपद घेण्यात काहीही अर्थ नाही, त्यामुळे मी नाराज नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तार हा 2024 नंतरच होणार आहे, असं विधान देखील त्यांनी केलंय. त्यामुळे आता अनेक आमदारांच्या मंत्रीपदाच्या आशा मावळल्याचा पहायला मिळतंय. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने मी कामात व्यग्र होतो, त्यामुळं आम्हाला अयोद्धेला जायला जमलं नाही, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसेच एकाच व्यक्तीकडे 8 ते 9 जिल्हे असल्यानं लोकांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत, त्यावर काम केलं पाहिजे, असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलंय.