मुंबई | मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असून यामुळे आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तिकीटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन दरवाढीमुळे एसटीला प्रचंड तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकीटाचे दर १७ % टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्वात महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाडेवाढीसाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परिवहन समिती तयार करण्यात आली आहे. समितीचा अहवाल महामंडळाच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात येईल. कोरोनाच्या संसर्गात आता पर्यंत एसटीला आतापर्यंत १२,५०० कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. याशिवाय कोट्यवधांची देणी शिल्लक आहेत. डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने खर्चात वाढ झाली आहे.
कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे 12 तास काम करूनही कर्मचाऱ्यांचे वेतन अनेकदा रखडले आहे.त्यातच डिझेलचे दर दहा टक्क्यांहून अधिक वाढल्यास, टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि सुटे भागांच्या दरातील वाढीच्या निकषांचा अभ्यास केला जातो. जून २०१८ मध्ये करण्यात आलेली शेवटची भाडेवाढ ज्या निकषांवर करण्यात आली. त्याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.