मुंबई : अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनीं मौन बाळगले असले तरी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी यावर भाष्य करत राऊतांचे विधान खोडून काढले होते.
यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत टोला लगावला आहे. पवार म्हणाले की, हे तीन पक्षांचं सरकार आहे. कुणाला मंत्री करायचं हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचं हा शरद पवार यांचा अधिकार आहे. हे तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना वक्तव्य करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये.
तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार यांनी नाव न गेट राऊतांना टोला लगावला आहे.