सध्या संपूर्ण देशभरात रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज रेमडेसिवीर, ऑक्सिजन यांचा देखील मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याच मुद्द्यावरून आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. प्रशासन जनतेची दिशाभूल करताना दिसत आहे. ऑक्सिजन जिल्ह्यात रुग्णांचा मृत्यू होऊनही मंत्री म्हणतात, जिल्ह्यात कशाचीच कमतरता नाही. मंत्र्यांनो, खोटी माहिती देऊन हवेत गोळीबार करू नका. हवेतून जमिनीवर या, असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
हा महिन्यांपूर्वीच आम्ही ऑक्सिजन प्लांट उभा करा म्हणून सांगितलं होतं, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. सांगली जिल्हा महामारीमुळे स्मशानभूमी होत आहे. गुजरातमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा येणार होता, पण त्या उद्योजकाला रात्रीच उचलून धमकावलं गेलं. अश्या प्रकारांमुळे उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. असच सुरु राहिलं तर, राज्य सरकारच्या भीतीने सर्व उद्योजक राज्याबाहेर जातील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी, या सरकारने राज्यात ठोकशाही सुरू केल्याचा आरोप केला आहे.
तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली, तर देवेंद्र फडणवीस यांच्या अचूक रणनीतीमुळे पंढरपुरात भाजपने निवडणूक जिंकल्याचे सांगितले. दुसरीकडे राज्यात विविध शहरांत महामारीने बाधित रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कडक निर्बंध लावूनही रुग्णवाढीला आळा बसत नसल्याने राज्य सरकारने राज्यभरात १४ एप्रिल पासून १ मे पर्यंत लावलेला लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.