दोन लोकांचे राज्यातील सरकार हे घटनाबाह्य व नियमबाह्य असून, लवकरच हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, असे भाकीत युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केले. दरम्यान, सरकार पाडण्याचे भाकीत करणाऱ्या आदित्यांच्या दौऱ्याकडे पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यादौऱ्यापूर्वी भिवंडीत शिवसेना फुटल्याचे चित्र दिसून आले होते.
शिवसेनेच्या १२ पैकी नऊ माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली. दौऱ्यावेळी संजय म्हात्रे, अशोक भोसले व मनीषा दांडेकर हे केवळ तीन माजी नगरसेवक हजर होते. शहरप्रमुख सुभाष माने हेही हजर नव्हते. मदन बुवा नाईक, गुलाब नाईक, अस्मिता नाईक, बाळाराम चौधरी, सुग्राबी हाजीशहा खान, मनोज काटेकर, वंदना काटेकर, अलका चौधरी, तुषार चौधरी यांनी दौऱ्याकडे पाठ फिरवली.
आदित्य ठाकरे यांनी ‘शिव-संवाद’ यात्रेला सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यातील यात्रेची सुरुवात भिवंडीपासून झाली. भिवंडीकडे जाताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर सत्कार केला आणि ठाकरे गटाने शक्तिप्रदर्शन केले.