मुंबई | सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच मंत्री आहेत. महाविकास आघा़डी सरकार पाडून आणि भाजप-शिंदे गट सरकार स्थापन करुन पंधरा दिवस उलटूनही अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष आता शिंदे सरकारवर टीका करत आहेत. तर शिंदे आणि फडणवीस या प्रश्नाला बगल देत ‘लवकरच’ असे उत्तर देत आहेत.
यावर आता रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सरकार चालवत आहेत. या दोन माणसांकडून सध्या राज्यात चांगले काम सुरु असल्याचे खोत म्हणाले. दोन वाढपे जर व्यवस्थित वाढत असतील, तर चाळीस जणांची काय गरज आहे, असा मिश्किल टोलाही खोत यांनी लगावला.
पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाळव्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, विधान परिषद आमदार गोपिचंद पडळकर एकत्र आले होते. यावेळी सगळ्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
आमच्या सरकारात एसटी कामगार सुखी होणार असे खोत म्हणाले. महाविकास आघाडीची सत्ता असताना, सकाळी सकाळी माणसांची घरासमोर एक किलोमीटर रांग असायची. सत्ता गेल्यावर मात्र सगळी गर्दी गायब झाली, शहाजी बापूंनाच परिवहण खाते देऊन टाकतो, असे यावेळी खोत म्हणाले.