काँगेस पक्षाचा जनतेशी संबंध तुटला आहे. तो आता पुन्हा जोडावा लागेल, असे सांगतानाच खासदार राहुल गांधी यांनी डिप्रेशनमध्ये न जाता लोकांमध्ये जाऊया. कारण ही एक मोठी लढाई आहे, असे नेत्यांना सांगितले. काँगेसला पुन्हा सत्तेत आणण्याचा रोड मॅपच राहुल यांनी पक्षाच्या चिंतन शिबिरात मांडला.
ऑक्टोबरमध्ये संपूर्ण पक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधेल. पक्षाचे नेते व कार्यकर्ते जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतील. जनतेशी नाते निर्माण करायचे असेल तर हे काम शॉर्टकटने होणार नाही. त्यासाठी मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल. ही संघटना लोकांमधून निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्याला लोकांमध्ये जावे लागेल. लोकांमध्ये बसून त्यांची अडचण काय आहे हे समजून घेतले पाहिजे. आपला जनतेशी जो संबंध होता तो पुन्हा निर्माण करावा लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.
यावेळी पण एकदा राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला होता. केंद्रातील मोदी सरकारने देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. एकीकडे बेरोजगारी आहे, तर दुसरीकडे महागाईच्या वणव्यात जनता होरपळत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम हिंदुस्थानवर होणारच आहे. मात्र सरकारकडे काही योजनाच नसल्याची टीका राहुल यांनी केली.