जेष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांचे काल हिंदुजा रुग्णालयात निधन झाले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांची भेट घेतली होती. आता याच मुद्द्यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे, ‘ठाकरे सरकारला स्वःताच्या अपयशामुळे मृत्यू झालेल्या स्वप्निल लोणकरच्या पालकांना भेटायला वेळ नाही मात्र, येथे जाण्यासाठी वेळ आहे. दुख:द पण सत्य’ असं म्हणत सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत MPSC ची परीक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्ण देखील झाला. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.