शिवसेनेतील ४६ आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. हे सर्व आमदार सोबत घेऊन शिंदे सध्या आसामची राजधानी गुवाहाटी येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकस आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ही मागणी केली आहे. शिवसेनेच्या १२ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवलेय. पहिल्या टप्प्यात १२ नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही सावंत यांनी सांगितलेय. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटमध्ये शिंदे म्हणालेत कि, कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत, असं ते म्हणालेत.