मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत मोठ्या वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत असून, कोरोना लसींचा तुटवडा आहे.
आता या परिस्थितीत विरोधकांनी राजकीय फाटे फोडता कामा नये. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी तेही महाराष्ट्राचे नेते आहेत, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
आज राज्यातील कोरोना स्थिती, लसींचा तुटवडा, बेड्स आणि ऑक्सिनजची कमतरता यांवर संजय राऊत यांनी भाष्य केले. ते मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलत होते. पुढच्या काही काळासाठी राजकीय अडचणीचे प्रश्न बाजूला ठेवले पाहिजे. कोरोनाच्या स्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. सगळ्यांनीच कोरोनाविरुद्धच्या युद्धात उतरले पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
तसेच पंतप्रधान मोदींनी लस महोत्सवाची घोषणा केली. लोकांनी लसीकरणात सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी आवाहन केले. मात्र, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लसींची तुटवडा आहे. यावरून कोणताही वाद न घालता केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस कशी देता येईल, याचा विचार करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.