मुंबई : कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खा. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजीच कोरोना त्सुनामी सारखे संकट असल्याचा इशारा दिला होता परंतु मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत भाजपच्या सर्व नेत्यांनी आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत दुर्लक्ष केले. परिणामी आज देशात दररोज ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण तसेच ४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि भोंगळपणा जबाबदार आहे असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
आज रायाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पात्र लिहिले होते. याचा दाखल देत पटोले म्हणाले की, सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे घणाघाती टीका पटोले यांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात काँग्रेस आणि भाजपा वाद वाढण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून मोदी सरकारने यासंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे घेऊन राज्यांना रामभरोसे सोडले. मोदींकडे ठोस धोरण नाही आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भाजप नेते सैरभेर झाले आहेत. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. ७० वर्षात कधी भारताची झाली नव्हती एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळे झाली आहे असे विधान त्यांनी यावेळी केले होते.
ऑक्सिजन पुरवठ्याबाबत टास्क फोर्स नेमून सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तबच केले आहे. पीएम केअरमधून ऑक्सिजन प्लँट उभारण्याच्या फक्त घोषणा केल्या प्रत्यक्षात केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रात एकही ऑक्सीजन प्लँट उभारला नाही. महाराष्ट्राची रोजची ऑक्सीजनची गरज १७५० मे. टन आहे. यातील १२०० मे टन महाराष्ट्रात निर्माण केला जातो यात मोदी सरकारचे काही योगदान नाही. ५५० मे टन अधिकचा ऑक्सिजन हवा होता तेही मोदी सरकार पुरवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. देशातील जनता रेमडेसीवीर मागत असताना भाजपाचे नेते रेमडेसीवीरचा काळाबाजार करण्यात व्यस्त होते.