पूरग्रस्तांसोबत भोजन घेत देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या व्यथा

 

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा जिल्ह्याचा दौरा केला. पूरग्रस्तांसोबत भोजन घेत त्यांनी सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्या. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याचा प्रारंभ त्यांनी आज सातारा जिल्ह्यातून केला. मोरगिरी/आंबेघर, शिद्रुकवाडी, कोयनानगर तसेच हुंबरळी इत्यादी ठिकाणी त्यांनी भेटी देत स्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अतुल भोसले, जयकुमार गोरे, नरेंद्र पाटील हे यावेळी उपस्थित होते.

कराड येथून रवाना होण्यापूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र भाजयुमोच्या वतीने मदतसामुग्री असलेल्या वाहनांना आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा झेंडा दाखवून रवाना केले. या मदतसामुग्रीत तयार अन्न, धान्यसामुग्री, पाणी, कपडे इत्यादींचा समावेश आहे. मोरगिरी/आंबेघर येथे पाऊस आणि पूर यामुळे संसार उघड्यावर पडलेले आहेत. तात्पुरत्या निवासी शिबिरांमध्ये त्यांना सद्या ठेवण्यात आले आहे. मोरणा विद्यालय मोरगिरी येथे या पूरग्रस्तांना भेटून, त्यांच्यासोबत भोजन करत त्यांच्या व्यथा देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. आंबेघर येथे दरड कोसळण्याच्या घटनेत सुमारे १५ लोकांचे प्राण गेले. त्यांच्या कुटुंबियांचे फडणवीस यांनी सांत्वन केले आणि त्यांना मदतसामुग्रीचे वाटप सुद्धा केले.

याठिकाणी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज याठिकाणी हे लोक शिबिरात राहत असले तरी त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत करून ते तातडीने करावे लागेल. सुरक्षित जागा शोधून त्यांना नवीन घरे बांधून द्यावी लागतील. पुनर्वसन करताना त्यांच्याशी सल्लामसलत करावी, अशी सूचनाही त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. या नागरिकांना इतर मदत, विविध स्त्रोतांमधून पोहोचते आहे. पण पुनर्वसन हेच प्राधान्य असले पाहिजे. यासाठी घरे आणि रोजगार असा साकल्याने विचार करावा लागेल. भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये, याची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: