महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले, असे गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही प्रत्युत्तर दिलं.
तसेच अशा प्रकारे तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र भाजप करते. पण उद्धव ठाकरे अतिशय सामंजस्याने काम करतात. 50 लोक निघून गेले मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या वेळी वजन वापरलं नाही. ते त्यांचं वजन वापरू शकत होते.. असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांत तथ्य नाही, असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलंय. औरंगाबादमध्ये माध्यमांशी बातचित केली. दिलीप वळसे पाटील यांनी केलेलं वक्तव्य योग्यच असल्याचं दानवे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केलेत. माझ्याकडून कोणतंही वैर नव्हतं. पण मातोश्रीचे दरवाजे उद्धव ठाकरे यांनी बंद केले. पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो, तरीही ते असं वागले. मविआने अडीच वर्ष माझ्यावर केसेस टाकण्याचं, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलं होतं, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.