नवी दिल्ली | केंद्राकडून सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला पाठींबा देत आहे. अशा वाहनांच्या खरेदीवर सबसिडीदेखील दिली जात आहे. सध्या देशात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेत आहेत. परंतु गेल्या काही महिनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा अपघातांमध्ये काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक स्कूटरशी संबंधित अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी याबाबत भाष्य करून कारवाईचा इशारा दिला.
ते म्हणाले, ‘गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी बाब आहे. या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करण्याबाबत शिफारसी करण्यासाठी आम्ही तज्ञांची समिती स्थापन केली आहे.
गडकरी पुढे म्हणाले, ‘अहवालाच्या आधारे, आम्ही दोषी असलेल्या कंपन्यांबाबत आवश्यक आदेश जारी करू. तसेच आम्ही लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करू. कोणत्याही कंपनीने त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास मोठा दंड आकारला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आदेशही दिले जातील.’