‘या’ जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी; दिवसभर जमावबंदीचाही आदेश

नगर : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी व दिवसभर जमावबंदीचा आदेश दिला आहे. हा आदेश २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू केला आहे.

 

नगर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अध्यादेश काढून जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

प्रशासनाने लग्न समारंभावर निर्बंध घातले आहेत, तसेच सर्व समारंभ, जत्रा, यात्रांना फक्‍त ५० व्यक्‍तींनाच उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली आहे. या सर्वांनी मास्कचा वापर करून सुरक्षित शारीरिक अंतराचा नियम पाळणे आवश्‍यक आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्‍के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. शाळा- महाविद्यालयांत ‘नो मास्क, नो एन्ट्री’चा अवलंब करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक संमेलने, विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ५० व्यक्‍तींमध्येच घेण्याचेही आदेशात म्हटले आहे.

वाचा: बेदाण्याला उच्चांकी झळाळी; मिळतोय ‘इतका’ भाव
दरम्यान, सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत दुकाने सुरू राहणार आहेत. त्यासाठी कुठलेही निर्बंध नसले, तरी सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करावे लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्‍त घराबाहेर पडू नये, तसेच घराबाहेर पडताना मास्क वापरावे, असे आदेशात म्हटले आहे. हे निर्बंध १५ मार्चपर्यंत अंमलात राहतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: