जन आशीर्वाद यात्रेमुळे राज्यात कोरोना वाढणार… अजितदादांचे भाकीत

जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी राज्यातील चार केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे भाजपकडून आयोजन करण्यात आले होते. मात्र या केंद्रीय मंत्र्यांची जिथे जन आशीर्वाद यात्रा गेली त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

यात्रांमुळे बसणार फटका

केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घ्यायला सांगितले आहे. लक्ष द्या, लक्ष द्या म्हणून सरकार सांगते, दुसरीकडे नव्या मंत्र्यांना यात्रा काढायलाही सांगते, या यात्रांमुळे फटका बसणार असल्याचे अजित दादा म्हणाले. जिथे-जिथे जन आशीर्वाद यात्रा गेली तिथे-तिथे कोरोनाची लागण वाढलेली दिसल्याचे अजित पवार म्हणाले.

याला कोण जबाबदार?

एकीकडे केंद्र सरकार सांगते कोरोना आहे काळजी घ्या. चार नवीन मंत्र्यांना मात्र यात्रा काढायला सांगितले जाते. याला कोण जबाबदार आहे? नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा, असे देखील अजित पवार म्हणाले. तसेच जिथं राजकारण करायचं आहे तिकडे सगळे राजकारण करू. पण जिथे जनतेचा प्रश्न आहे, तिकडे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यामुळे सण साजरे करताना काळजी घ्या, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: