भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ८७.७८ टक्के आणि कोरोना मृत्यू दर १.५२ टक्केपर्यंत खाली
नवी दिल्ली: भारतात कोरोना संकट हळू हळू नियंत्रणात येत आहे. देशात आठ लाखांपेक्षा कमी कोरोना अॅक्टिव्ह केस आहेत. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट ८७.७८ टक्के आहे. परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी नोव्हेंबर अखेरपर्यंतचा कालावधी देशासाठी खूप महत्वाचा आहे. या दिड महिन्याच्या कालावधीत कोरोना नियंत्रणात आला तर संकटाची तीव्रता वेगाने कमी होईल. मात्र या कालावधीत नागरिकांकडून हलगर्जीपणा झाल्यास पुन्हा परिस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे.
ताज्या आकडेवारीनुसार भारतात ७४ लाख ३२ हजार ६८० जणांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी १ लाख १३ हजार ३२ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला. कोरोना झालेल्यांपैकी ७ लाख ९५ हजार ५३ जण अद्याप कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण (कोरोना अॅक्टिव्ह केस corona active cases or covid19 active cases) आहेत. देशातील कोरोनाबाधितांपैकी ६५ लाख २४ हजार ५९५ जण बरे झाले. ते कोरोनामुक्त झाले.
भारतात नवरात्र, दिवाळी या सणांच्या निमित्ताने नागरिक बाहेर पडण्याची आणि भेटीगाठीच्या निमित्ताने एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे. याच कारणामुळे पुढील दिड महिना भारतासाठी महत्त्वाचा आहे. या कालावधीत कोरोना संकट वाढले नाही तर देशातली महामारीची समस्या लवकरच आटोक्यात येईल.
सध्या भारतामध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या लसींसाठी प्रयोग सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी भारतीय लस २०२१च्या पहिल्या तिमाहीत तयार होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ८७.७८ टक्के आणि कोरोना मृत्यू दर १.५२ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारत बायोटेक आणि सीरमसह देशातील सात कंपन्या कोरोनावर मात करण्यासाठी लस करण्याकरिता संशोधन करत आहेत. प्रत्येक संस्थेचे संशोधन वेगवेगळ्या टप्प्यावर असले तरी प्रगतीपथावर आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लस आल्यास संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे. ताज्या अहवालानुसार सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांचे प्रयोग यशस्वी झाल्यास या दोन्ही कंपन्या २०२१च्या पहिल्या तिमाहीत लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.
कोणतीही लस घेतल्यानंतर मर्यादीत साईड इफेक्ट होण्याचा धोका असतो. पण हे साईड इफेक्ट कमीत कमी त्रासदायक असावेत यासाठी प्रयोग सुरू आहेत. सरकार सुरक्षेची खात्री झाल्याशिवाय लसीकरण सुरू करणार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले
लस निर्मिती आणि लसीकरण मोहिमेसाठी नियोजन सुरू आहे. सरकारी आणि खासगी हॉस्पिटल तसेच दवाखान्यांचे डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आशा वर्कर्स, स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना सर्वात आधी कोररोनाची लस दिली जाईल. यानंतर देशातील इतर नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. जुलै २०२१ पर्यंत किमान २० ते २५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन सुररू आहे.