राजकारणात वाईट दिवस सुरू असलेला काँग्रेस पक्ष आता अॅक्शन मोडमध्ये आला असून काँग्रेसचं तीन दिवसीय चिंतन शिबीर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते.
सोनिया गांधी यांनी यावेळी उदयपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या चिंतन शिबीरात जवळपास ४०० सहकारी सहभागी होणार असल्याचं सांगितलं. यातील बहुतांश नेते पक्षात विविध महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. या शिबीराआधी सोनिया गांधी यांनी नेत्यांना संबोधित करताना काँग्रेस पक्षानं आजवर तुम्हाला खूप काही दिलं आहे. आता पक्षाच्या कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली आहे, असं स्पष्टच सांगितलं.
“आपल्या सर्वांसाठी आता काँग्रेस पक्षानं केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी आजवर महत्वाची पदं उपभोगली आहेत. आता तुम्ही पक्षाचा विचार केला पाहिजे. अर्थातच पक्षातील त्रृटींवर भाष्य करणं आणि टीका करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण स्वपक्षावर केलेल्या टीकेमुळे पक्षातील इतर नेत्यांचा आत्मविश्वासाला तडा जाईल आणि नकारात्मक वातावरण तर तयार होत नाही ना? याचा विचार करायला हवा”, असं सोनिया गांधी म्हणाल्या.